आगीच्या विळाख्यात येऊन शेतकर्यांचा होरपळून दुर्देवी मृत्यू !
✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा मो. नं.9373472847
भंडारा : (दिनांक १९ में ) भंडारा जिल्हयातील तालुका साकोली शहराला लागून असलेल्या लाखांदूर रोड परिसरातील मक्याच्या शेताला आग लागली. डोळ्यादेखत पिक जळताना पाहून शेतकरी आग विझवायला धावला. मात्र त्या आगीत सापडल्याने शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाला. रामदास गोखलू निंबेकर ( वय ६५ वर्षे , तलाव वॉर्ड, साकोली) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून ही हृदयद्रावक घटना मंगळवार, १९ मे रोजी सकाळी १०:२५ वाजताच्या सुमारास घडली.
रामदास निंबेकर यांचे शेत रस्त्यालगत आहे. शेतामध्ये त्यांनी मक्याचे पिक लावले होते. परिपक्व झालेले पिक सुकण्याच्या बेतात असतानाच अचानकपणे शेताला आग लागली. संपूर्ण पिकच आगीत जळायला लागले. हे पाहून त्यांनी पिक वाचविण्यासाठी धाव घेतली. मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने ते आगीच्या विळख्यात सापडले. यात त्यांचा होरपळून अंत झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. आगीमधून त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, मात्र आग मोठ्या प्रमाणात पसरल्याने नागरिकांचे प्रयत्न निष्फळ ठरले.
माजी नगरसेवक हेमंत भारद्वाज यांनी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन पथकाने शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र, शेतकरी रामदास निंबेकर यांना वाचविण्यात यश आले नाही. आगीत शेतातील झालेल्या नुकसानीची पाहणी तलाठ्यांनी करून नोंद घेतली.
*आगीचे कारण अस्पष्ट*
वणव्यामुळे आग लागली की अन्य कारणामुळे, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. माहिती मिळताच साकोली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी साकोली उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Post a Comment
0 Comments