Type Here to Get Search Results !

राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा जागर आवश्यक - अशोक सिब्बल




मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक✍🏻

8208166961/9860020016 


अहिल्यानगर, दि. २६: – राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने लोकराजा आणि तत्त्वज्ञ होते. लोककल्याणाची भूमिका त्यांनी कायम जोपासली आणि त्यानुसार अनेक लोकहितकारी निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी केली. आजच्या काळात राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे स्मरण, जतन आणि प्रसार करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन प्रमुख व्याख्याते अशोक सिब्बल यांनी केले.


समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयातील सभागृहात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.


यावेळी सहायक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार, विशेष अधिकारी सावित्रा लबडे, सहाय्यक लेखाधिकारी संदीप देठे, रेनाविकार विद्यालयाचे प्राचार्य राजेश भालसिंग, बार्टीचे वरिष्ठ संशोधन अधिकारी दिलावर सय्यद आदी उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


प्रमुख व्याख्याते अशोक सिब्बल म्हणाले, सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून काम करणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांचा इतिहास प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचे स्मरण आणि आचरण आजच्या काळात अधिक आवश्यक आहे. त्यांनी वैचारिक प्रबोधनाचा वारसा समाजाला दिला. सर्वधर्मसमभावाचा संदेश त्यांनी केवळ दिला नाही, तर तो प्रत्यक्ष कृतीतूनही सिद्ध केला.


सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून शिक्षणाचा विस्तार, महिलांच्या सक्षमीकरणासाठी कायदे व धोरणे, आरक्षणाची अंमलबजावणी, सर्व धर्मीयांना समान रोजगाराच्या संधी, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार, शेतीसाठी पाण्याची उपलब्धता, सहकारी संस्थांची उभारणी, औद्योगिक विकासाला चालना तसेच क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्राच्या प्रगतीसाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. समानतेच्या तत्त्वावर सर्वांना संधी उपलब्ध करून देण्याचा त्यांचा दृष्टिकोन आजही मार्गदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.


प्राचार्य राजेश भालसिंग म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून दरवर्षी विविध उपक्रमांनी साजरी केली जाते. ते समाजातील दुर्बल व वंचित घटकांचा आधारस्तंभ होते. बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत समाजहिताचे आचरण करण्याचे आवाहन त्यांनी केले.


सूत्रसंचालन शिवानी शिंगवी यांनी केले, तर आभार प्रदर्शन विशेष अधिकारी सावित्रा लबडे यांनी केले.


कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी, विविध शाळांतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, बार्टीचे समतादूत तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


समता दिंडीस उत्स्फूर्त प्रतिसाद


राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त समता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. सहायक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दिंडीस प्रारंभ झाला. या दिंडीत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी, अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले असून दिंडीस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Post a Comment

0 Comments