Type Here to Get Search Results !

कल्याण कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये भावनांचा संगम ; बी.एस्सी.च्या पहिल्या आणि जी.एन.एम.च्या तिसऱ्या बॅचला दिमाखदार निरोप.




मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

8208166961/9860020016


राजुरा  : -कल्याण कॉलेज ऑफ नर्सिंग, राजुरा येथे आयोजित करण्यात आलेला निरोप समारंभ विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी अविस्मरणीय ठरला. बी.एस्सी. नर्सिंगच्या पहिल्या (पायोनियर) बॅचला तसेच जी.एन.एम. नर्सिंगच्या तिसऱ्या बॅचच्या विद्यार्थ्यांना भावपूर्ण वातावरणात निरोप देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. महाविद्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी पार पडलेल्या या सोहळ्याने इतिहासाची नोंद केली. कारण संस्थेच्या बी.एस्सी. नर्सिंगच्या पहिल्या बॅचने शिक्षणाचा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण करून व्यावसायिक आरोग्य सेवेत प्रवेश करण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला.

           कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मा. सुभाषभाऊ धोटे हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, परिचारिका या आरोग्य व्यवस्थेचा कणा असून समाजसेवा, करुणा आणि समर्पणाची भावना जपत प्रत्येक विद्यार्थ्याने रुग्णसेवेत आपले योगदान द्यावे. यावेळी इन्फंट जिझस सोसायटीचे अध्यक्ष अभिजित धोटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संस्थेने दिलेली मूल्याधिष्ठित शिक्षणाची परंपरा जपण्याचे आवाहन केले. सेवा, शिस्त आणि वैद्यकीय नैपुण्याच्या बळावर समाजात वेगळी ओळख निर्माण करण्याचा संदेश त्यांनी दिला. महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष शिंदे यांनी शैक्षणिक अहवाल सादर करत बी.एस्सी. आणि जी. एन. एम. च्या विद्यार्थ्यांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक व प्रात्यक्षिक प्रशिक्षणात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

        यावेळी निरोप समारंभात महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागतील विद्यार्थ्यांनी वरिष्ठांसाठी नृत्य, संगीत, समूह सादरीकरणे आणि भावनिक भाषणांच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या. जुन्या आठवणींना उजाळा देताना अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. यावेळी बी.एस्सी. नर्सिंगच्या पहिल्या बॅचसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष स्पर्धेत आदित्य वंजारी याला ‘मिस्टर फ्रेशर’ तर दीक्षा रिंगणे हिला ‘मिस फ्रेशर’ हा मानाचा किताब प्रदान करण्यात आला. त्यांच्या आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्वाने आणि उत्कृष्ट सादरीकरणाने परीक्षकांची मने जिंकली. 

       कार्यक्रमाच्या शेवटी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच रुग्णसेवा, वैद्यकीय नैतिकता आणि मानवतेची जपणूक करण्याची शपथ विद्यार्थ्यांनी घेतली. या प्रसंगी प्राध्यापक, , शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments