व्येकटेश चालुरकर
तालुका प्रतिनिधी अहेरी
92099822212
अहेरी अभियानांतर्गत पर्यावरण संवर्धन, हरित क्षेत्रात वाढ तसेच नैसर्गिक संसाधनांचे जतन करण्याच्या उद्देशाने उप पोलीस स्टेशन दामरंचा, तालुका – अहेरी, जिल्हा- गडचिरोली येथील बी/09 समवाय यांच्या वतीने भव्य वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे नेतृत्व समवाय अधिकारी निरीक्षक/जीडी श्री एम. वेंकट रेड्डी यांनी केले.
यावेळी उप पोलीस स्टेशन दामरंचा येथील पोलीस निरीक्षक (ठाणे प्रभारी) पृथ्वीराज बाराते, उपनिरीक्षक निखिल भोवते, उपनिरीक्षक अनिकेत संकपाल तसेच बी/09 समवाय आणि उप पोलीस स्टेशन दामरंचा येथील सर्व अधिकारी व जवान यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून छावणी परिसर तसेच परिसराबाहेर एकूण 500 विविध प्रजातींच्या वृक्षांचे रोपण केले. या वृक्षारोपणामध्ये आंबा, आवळा, सीताफळ तसेच विविध औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतींची लागवड करण्यात आली. या वृक्षांमुळे भविष्यात परिसरातील हरित क्षेत्र वाढण्यास, पर्यावरणाचा समतोल राखण्यास, जैवविविधतेचे संवर्धन होण्यास तसेच स्वच्छ व निरोगी वातावरण निर्माण होण्यास मोठी मदत होणार आहे. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी वृक्षारोपणाबरोबरच लावलेल्या प्रत्येक रोपाचे संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्प व्यक्त केला. "वृक्ष लावणे ही केवळ सुरुवात असून त्यांचे संरक्षण व संवर्धन करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे," असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व अधिकारी व जवानांनी "एक जवान – एक वृक्ष" आणि "हरित भारत, स्वच्छ भारत" या संकल्पनेला बळकटी देत पर्यावरण संरक्षणासाठी सातत्याने कार्य करण्याची प्रतिज्ञा घेतली.

Post a Comment
0 Comments