Type Here to Get Search Results !

पॉश कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी समितीने तक्रार निवारणासह जनजागृतीवर भर द्यावा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर


मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक✍🏻

8208166961/9860020016 


      अमरावती, दि. 3:-  मातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व हा तिहेरी संगम सुरक्षित रहावा, यासाठी पॉश कायद्याची अंमलबजावणी चोख व्हावी, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येक कामाचे ठिकाण हे सुरक्षितता, सन्मान आणि समान संधी देणारे असले पाहिजे. त्यादृष्टीने पॉश कायद्यांतर्गत आस्थापनांमध्ये स्थापित तक्रार निवारण समित्यांनी अधिक जागरूक राहून कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच याबाबत जनजागृती करण्यावर भर द्यावा, असे आवाहन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी आज येथे केले.


    कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून संरक्षण (पॉश ऍक्ट) कायद्याबाबत कार्यशाळा श्रीमती रहाटकर यांच्या उपस्थितीत नियोजन भवनात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या.


    जिल्हाधिकारी आशिष येरेकर, यवतमाळ जिल्हाधिकारी विकास मीना, बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण कुमार देवरे, विधी सचिव श्री. सहारे, महिला आयोगाचे उपसंचालक रामावतार सिंह, नंदिता प्रधान आदी उपस्थित होते.


     श्रीमती रहाटकर म्हणाल्या की, महाराष्ट्र हे संवेदनशील राज्य आहे. महिलांसाठी प्रत्येक कामाचे ठिकाण हे सुरक्षितता, सन्मान आणि समान संधी देणारे असले पाहिजे. महिलांना सुरक्षित आणि भेदभावमुक्त कामाचे वातावरण मिळावे यासाठी ‘पॉश’कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि त्याचे नियमित ऑडिट होण्याची गरज आहे. राष्ट्रीय महिला आयोगामार्फत महिलांच्या विविध विषयांवर वेगवेगळे संशोधन सातत्याने सुरू असतात. या संशोधनातून स्त्रियांसाठी आवश्यक कायदे, त्यांचे अधिकार  यावर निर्णय घेण्यास मदत होते.


     सरकारी, खासगी, संघटित तसेच असंघटित क्षेत्रातील प्रत्येक स्थळी  कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई व निवारण  कायद्याच्या तरतुदींची काटेकोर अंमलबजावणी करावी. महिलांसाठी सुरक्षित, सर्वसमावेशक आणि लिंग-संवेदनशील कार्य वातावरण निर्माण करण्यावर भर देण्यात यावा. कायद्याने महिलांना संरक्षण दिले आहे. यासाठी अंतर्गत तक्रार समित्या  प्रभावीपणे कार्यरत राहून कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी.  तक्रार निवारण प्रक्रियेत पारदर्शकता असावी, असेही निर्देश त्यांनी दिले.


    निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी प्रास्ताविक केले. विविध आस्थापनांमधील तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष, सदस्य,महिला कार्यशाळेत सहभागी झाल्या होत्या. यावेळी उपस्थितांच्या प्रश्नांचे निरसन करण्यात आले.


   यादरम्यान श्रीमती रहाटकर यांनी श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयातील 'यशोदा एआय' कार्यक्रमात उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी नवे तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रामध्ये महिलांची जागरूकता आणि सहभाग वाढवण्यास प्रोत्साहन दिले.


     यावेळी प्रभारी प्राचार्य संगीता इंगोले, कॉलेज कौन्सिलिंगच्या जे. डी. थोटे, डीबीटी समन्वयक डी. डी. खेडकर आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments