पाण्याच्या समस्येवर AIMIM ची तीव्र नाराजी; तात्काळ उपाययोजनेची मागणी
अर्पित वाहाणे
वर्धा शहर प्रतिनिधी
मो 8956647004
वर्धा : वर्धा शहरातील प्रभाग क्र. १८ मधील पाकीजा कॉलनी परिसरातील मुख्य रस्त्यावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून नागरिकांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. हा रस्ता एका प्रभागाला दुसऱ्या प्रभागाशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग असून परिसरातील धार्मिक स्थळी जाणाऱ्या भाविकांसह शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात या मार्गाचा वापर करतात.
रस्त्यावर पाणी साचल्यामुळे नागरिकांना ये-जा करणे कठीण झाले असून शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना दररोज मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच वाहनचालकांनाही अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे, या रस्त्याचे बांधकाम होऊन अवघे एक वर्ष झाले असतानाच त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत अशी मागणीही ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) ने केली आहे.
या गंभीर समस्येबाबत AIMIM चे शहराध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी आसिफ खान यांनी नगराध्यक्षांना निवेदन देऊन तात्काळ कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी संबंधित विभागाने त्वरित पाहणी करून आवश्यक ती दुरुस्ती व पाणी निचऱ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याकडे दुर्लक्ष झाल्यास ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) च्या वतीने तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या सर्व परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी संबंधित विभागाची राहील, असा इशाराही AIMIM पक्षांनी दिला आहे.

Post a Comment
0 Comments