विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी मो. 9421856931
एटापल्ली - एटापल्ली तालुक्यातील मुख्य रस्त्याच्या दुरवस्थेसह विविध मूलभूत समस्यांबाबत प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने व्यापारी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मंगळवार दि. १ सप्टेंबर पर्यंत लेखी उत्तर न मिळाल्यास बुधवार दि. २ सप्टेंबर रोजी एटापल्लीतील संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचा इशारा व्यापारी संघटनेने दिला आहे.
व्यापारी संघटनेने उपविभागीय अधिकारी, एटापल्ली यांना दि. ३१ ऑगस्ट रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एटापल्लीतील मुख्य रस्ता व तालुक्यातील इतर समस्यांबाबत दि. २४ जुलै रोजी तहसीलदार साहेबांना आणि दि. १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले होते. मात्र, एक महिना उलटूनही या पत्रांना कोणतेही उत्तर मिळाले नाही आणि प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झाली नाही.
प्रशासनाच्या या अनास्थेच्या निषेधार्थ २ सप्टेंबरला शासनाच्या विरोधात बाजारपेठ बंद ठेवण्यात येईल, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. या पत्राच्या प्रती ठाणेदार, एटापल्ली, मुख्याधिकारी, नगर पंचायत आणि तहसीलदार यांना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, एटापल्ली तालुक्यात रस्ते, पूल आणि आरोग्य सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला असताना व्यापाऱ्यांनी पुकारलेला हा बंद प्रशासनाला जागे करेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment
0 Comments